मुंबईत घरे उपलब्ध होणे कठीण – म्हाडा उपाध्यक्ष जयस्वाल यांचे मत….
मुंबई, दि. १९ : मंगेश म्हात्रे
गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देणे हे अजूनही मोठे आव्हान असल्याचे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या संदर्भात सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना वेळ लागणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत.
म्हाडाच्या संकेतस्थळावरील ‘म्हाडासाथी’ या एआय चॅटबॉटचे उद्घाटन गुरुवारी वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात जयस्वाल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “गिरणी कामगारांसाठी कल्याण येथे जागा निश्चित करण्यात आली होती; मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे ती योजना पुढे जाऊ शकली नाही. त्यानंतर कर्जत-नेरळ येथे पर्यायी जागेचा विचार झाला, पण तेथे आवश्यक पायाभूत सुविधा नसल्याने या योजनेवर विचार सुरू आहे. त्यामुळे मुंबईतच घरे उपलब्ध करून देणे सध्या कठीण आहे,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, धारावी पुनर्विकासासाठी जमीन सहज उपलब्ध होत असताना गिरणी कामगारांच्या घरांसाठी अद्याप ठोस तोडगा निघू न शकल्याने कामगार संघटनांकडून नाराजी व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी काढलेल्या मोर्च्यात कामगारांनी सरकारकडे घरांचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी “मुंबईतच घरे मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू,” असे आश्वासन दिले होते.
गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन प्रत्यक्षात आणणे कठीण असल्याचे कामगारांना मुंबईतच घरे मिळणे आव्हानं असल्याचे वक्तव्याने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कामगारांना दिलेल्या आश्वासनावर अधांतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे स्पष्ट होत असून सरकारकडून याबाबत पुढील पावले काय उचलली जातील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




















