सतीश खंडागळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मुंबई, दि २२ : मंगेश म्हात्रे
कालिना येथील जोसेफ बाप्तिस्ता गार्डनमधील कृत्रिम जलतलावाची दुरवस्था झाली असून, तो नैसर्गिक स्वरूपात पुनर्स्थापित करावा, तसेच कोळीवन्ही गावठाण येथील रहिवाशांना सामाजिक उपक्रमांसाठी खुली जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपचे वॉर्ड क्रमांक ९० चे अध्यक्ष सतीश ए. खंडागळे यांनी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जोसेफ बाप्तिस्ता गार्डनमधील कृत्रिम तलावाची अनेक वर्षांपासून योग्य देखभाल न झाल्याने तो अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या तलावामुळे परिसराच्या सौंदर्यावर परिणाम होत असून, नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवाशांकडून यासंदर्भात वारंवार तक्रारी येत असल्याचे खंडागळे यांनी नमूद केले आहे. हा तलाव मूळ नैसर्गिक स्वरूपात पुनर्स्थापित केल्यास परिसरातील पर्यावरणीय संतुलन राखले जाईल, पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि गार्डनचे सौंदर्य खुलून येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच, कोळीवन्ही गावाच्या बाजूस असलेल्या गार्डन परिसरातील महानगरपालिकेच्या खुल्या जागेचा उपयोग सध्या होत नसून, ही जागा स्थानिक गावठाण रहिवाशांना सामाजिक, सांस्कृतिक व विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना एकत्र येण्यासाठी व समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यास हक्काची जागा मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
या दोन्ही मागण्यांवर जिल्हा प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत महसूल सहायक जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडेही या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.



















