कोपरगाव, दि २३ : ( चंद्रकांत जोर्वेकर )
कोपरगाव–जुना टाकळी रोड नाका येथील एम.डी.आर-९९ क्रमांकाचा रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाला असून त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. या मार्गावर अपघातांचा धोका वाढला असतानाही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय जाधव यांनी केला आहे. रस्ता तातडीने अतिक्रमणमुक्त करून दर्जेदार रस्त्याचे काम न केल्यास अमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात जाधव यांनी १९ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमण हटविण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, २६ जानेवारी २०२६ पर्यंत एम.डी.आर-९९ रस्त्यावरील अतिक्रमण न हटविल्यास कोपरगाव तहसील कार्यालयासमोर कोणतीही पूर्वसूचना न देता अमरण उपोषण सुरू करणार असल्याचा ठाम इशारा विजय जाधव यांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.



















