आरटीआयमुळे भांडाफोड
मुंबई, दि.२३ : मंगेश म्हात्रे
म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचा कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, समाजकल्याणाच्या नावाखाली सुरू असलेला गोंधळ माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे. माजी स्थानिक राज्यसभा खासदार यांच्या निधीतून उभारण्यात आल्याचा दावा असलेल्या वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीमधील नागरी आरोग्य केंद्रासमोरील समाजकल्याण केंद्राबाबत माहिती मागविण्यात आली असता, संबंधित कामाची कोणतीही अधिकृत नोंदच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
माहिती अधिकार अधिनियमांतर्गत आनंद कांबळे यांनी या समाजकल्याण केंद्राच्या कामासंदर्भात सविस्तर माहिती मागवली होती. यानंतर कांबळे यांनी प्रत्यक्ष म्हाडा कार्यालयात भेट दिली असता, झोपडपट्टी सुधार मंडळाचे कनिष्ठ अभियंता उगले डी. बी. यांनी खासदार निधीतून करण्यात आलेल्या सर्व कामांची यादी दाखवली. मात्र त्या यादीत समाजकल्याण केंद्राचा कुठेही उल्लेख नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मागितलेली माहिती देणे शक्य नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी हात वर केले.
सार्वजनिक निधीतून काम झाल्याचा दावा केला जात असताना त्याची नोंदच उपलब्ध नसणे, हा प्रकार गंभीर मानला जात आहे. समाजकल्याणासाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत की त्या केवळ कागदावरच राहिल्या आहेत, असा सवाल आनंद कांबळे यांनी उपस्थित केला आहे. पारदर्शकतेसाठी असलेल्या माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारणा होऊनही संबंधित विभागाकडे माहितीच नसणे, हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
दरम्यान, माहिती न दिल्यास प्रथम अपील करण्याचा सल्ला देत म्हाडाने कांबळे यांना पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यास सांगितले आहे. झोपडपट्टीतील नागरिकांच्या विकासासाठी जबाबदारी असलेल्या मंडळाकडूनच अशी बेजबाबदार भूमिका घेतली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळात नेमके काय सुरू आहे, समाजकल्याणाच्या नावाखाली मंजूर निधीचा वापर कुठे झाला, की तो मुद्दाम लपवण्यात आला, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आनंद कांबळे यांनी केली आहे.



















