अज्ञातांनी शेतकऱ्याच्या चार एकर तुरीला आग लावून जाळले..
काकासाहेब तांगडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान; शेतकरी वर्गात तीव्र संताप..
दावरवाडी ,२९.( अभिजीत सोनवणे )
तालुका पैठण अंतर्गत दावरवाडी शिवारातील गट नंबर ५१७/१ मधील शेतकरी काकासाहेब रामराव तांगडे यांच्या चार एकर क्षेत्रावरील तुरीच्या पिकाला अज्ञात समाजकंटकांनी काल रात्री आग लावून संपूर्ण पीक जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

संपूर्ण हंगामभर रक्ताचे पाणी करून पिकवलेली तूर एकत्र करून आजच मशीनद्वारे मळणी करण्याची तयारी सुरू होती, मात्र त्याच्या अवघ्या एक दिवस आधीच ही अमानुष आणि क्रूर घटना घडली. आगीच्या लोटात शेतकऱ्याचे महिन्यांचे कष्ट, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह जळून खाक झाला आहे.
पहाटे शेतात गेल्यानंतर संपूर्ण शिवार काळ्या राखेत बदललेले पाहून काकासाहेब तांगडे अक्षरशः कोलमडून पडले. शेतकऱ्याच्या डोळ्यांसमोर त्याचे स्वप्न, भविष्य आणि संसार उद्ध्वस्त झाला आहे.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीती, संताप आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर घटनेची तक्रार पाचोड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शेतकऱ्याच्या पिकाला आग लावण्यासारखा अमानुष गुन्हा करणाऱ्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
सतत निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देणारा शेतकरी आता अशा समाजविघातक कृत्यांचा बळी ठरत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील तांगडे, ईश्वर कांबळे, आप्पासाहेब राऊत, व आदी ग्रामस्थ उपस्थित होते..


















