२००० चौ. फुटाच्या घरांसाठी रहिवाशी ठाम..
मुंबई : मंगेश म्हात्रे
मोतीलाल नगरमध्ये सुरू असलेल्या पुनर्विकास प्रक्रियेत नव्या वळणामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री आणि म्हाडा यांच्यासोबत अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू असतानाच अदानी समूहाशी संबंधित असल्याचं सांगणारे काही प्रतिनिधी चाळी पाडण्याच्या सूचना देत घराघरांत फिरत असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
आंबेडकर मैदान परिसरात प्रस्तावित विकासकामाच्या अनुषंगाने आजूबाजूच्या चाळी हटवण्यात येणार असल्याचे सांगितले जात असल्याने, अनेक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मोतीलाल नगरातील रहिवाशांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विकासाबाबतची पारदर्शकता आणि अधिकृत प्रक्रियेचा आग्रह धरण्यात आला.
मोतीलाल नगर विकास समितीचे अध्यक्ष युवराज मोहिते यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, रहिवाशांशी चर्चा न करता किंवा सरकारी निर्णयांशिवाय कोणतीही कारवाई स्वीकारली जाणार नाही. “पुनर्विकास हा रहिवाशांची घरे न पाडता आणि त्यांचे हक्क सुरक्षित ठेवूनच व्हायला हवा,” अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
सध्या सरकार आणि म्हाडाकडे प्रत्येक रहिवाशाला किमान २,००० चौरस फूटाचे घर मिळावे, यासाठी चर्चा सुरू असल्याची माहितीही देण्यात आली. त्यामुळे तोपर्यंत कोणत्याही प्रकारची घाईगडबड किंवा दबाव स्वीकारला जाणार नाही, असा एकमताने निर्णय झाला आहे.
या विषयावर म्हाडा आणि राज्य सरकारकडे औपचारिक तक्रार करून दाद मागण्याचे, तसेच गरज भासल्यास कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे संकेतही रहिवाशांनी दिले आहेत. सध्या मोतीलाल नगरमध्ये विकासाबाबत आशा आणि अस्वस्थता दोन्ही एकाच वेळी दिसत असून, पुढील अधिकृत निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















