उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या तक्रारींवर थेट चर्चा व तात्काळ निर्णय
मुंबई : प्रतिनिधी
म्हाडाचा पंधरावा लोकशाही दिन सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या लोकशाही दिनाचे अध्यक्षस्थान म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल भूषविणार आहेत.
जानेवारी २०२४ पासून दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नियमितपणे म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून, आतापर्यंत १४ लोकशाही दिनांचे यशस्वी आयोजन झाले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा करून तात्काळ निर्णय घेतले जात आहेत.त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघाली असून नागरिकांना सुलभ, पारदर्शक व त्वरित न्याय मिळत आहे.
प्रत्येक लोकशाही दिनापूर्वी मागील लोकशाही दिनात घेतलेल्या निर्णयांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा स्वतः जयस्वाल घेतात. यामुळे प्रशासनाची उत्तरदायित्वाची भावना अधिक बळकट झाली असून, नागरिक व प्रशासन यांच्यातील विश्वासाचा दुवा अधिक मजबूत झाला असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी तक्रार अर्ज विहित नमुन्यात असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी आपले अर्ज लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये सादर करावेत. विहित नमुना अर्ज म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mhada.gov.in) ‘नागरिकांसाठी’ या विभागातील ‘लोकशाही दिन’ या सदरात उपलब्ध आहे.
निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असावे. न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व अथवा अपील्स, सेवाविषयक व आस्थापना विषयक बाबी, अपूर्ण कागदपत्रांसह सादर केलेले अर्ज तसेच यापूर्वी अंतिम उत्तर देण्यात आलेल्या विषयांवरील पुनरावृत्ती अर्ज लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. स्वीकृत न होणारे अर्ज संबंधित विभागाकडे आठ दिवसांच्या आत पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जातील, तसेच त्याची प्रत अर्जदारालाही देण्यात येईल, असे म्हाडा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


















