ताफ्यातील वाहनांनाही कात्री; मोदींच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद
ठाणे : अजय मगरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे केलेले आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ स्वीकारत आजपासून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रहितासाठी प्रत्येकाने इंधन बचतीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोविड काळात जनतेने पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे देश संकटातून सुरक्षित बाहेर पडला. आता युद्धजन्य परिस्थितीतही नागरिकांनी केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिंदे यांनी आज निवासस्थानाहून सह्याद्री अतिथीगृहात जाताना ईव्ही गाडीचा वापर केला. सुरक्षा व्यवस्थेतील आवश्यक वाहने वगळता इतर वाहनांचा ताफा कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देश मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करत असल्याने पेट्रोल-डिझेलचा संयमित वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“मोदीजी नेहमी ‘नेशन फर्स्ट’ या भूमिकेतून निर्णय घेतात. त्यामुळे राज्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांनाही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे शिंदे म्हणाले. विरोधकांनी अशा गंभीर परिस्थितीत राजकारण न करता राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई यांनी आपला कौटुंबिक युरोप दौरा रद्द करण्याची घोषणा केली असून नगरविकास विभागाने डेन्मार्क दौरा रद्द केला आहे. त्यामुळे केंद्राच्या इंधन बचतीच्या आवाहनाला राज्य सरकारमधून प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


















