ठाणे, दि.१४.( अजय मगरे )
जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, हे ठाण्यातील सायली जाधव हिने सिद्ध करून दाखवले आहे. आर्थिक अडचणी, आईची आजारी प्रकृती आणि जन्मजात डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या समस्येवर मात करत सायलीने SSC परीक्षेत तब्बल ९७ टक्के गुण मिळवत यशाची उज्वल गाथा लिहिली आहे.

सायलीचा जन्म ठाण्यात झाला असून सध्या ती मुलुंड चेकनाका परिसरातील पडवळनगर येथे राहते. तिचे वडील कपड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करतात, तर आई गृहिणी असून अल्सर आणि बीपीच्या त्रासामुळे नेहमी आजारी असते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांचे स्वतःचे घरही नाही. आजोबांनी राहण्यासाठी दिलेल्या घरात हे कुटुंब वास्तव्यास आहे.
लहानपणापासूनच सायलीला डोळ्यांमध्ये जन्मजात मोतीबिंदूचा त्रास होता. शाळेतील फळ्यावर लिहिलेले स्पष्ट दिसत नसल्याने अभ्यासात अडचणी येत होत्या. पहिलीत असताना तिचे ऑपरेशन झाले, मात्र डाव्या डोळ्याची दृष्टी अजूनही अंधुक आहे. तरीही या कमतरतेला कमजोरी न बनवता तिने त्याच जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला.
शालेय जीवनाच्या सुरुवातीला एव्हरेज विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाणारी सायली पुढे सेकंडरी विभागात गेल्यानंतर अभ्यासात सातत्य, शिस्त आणि फोकस आणत शाळेतील गुणवंत विद्यार्थिनींपैकी एक बनली. Seth B.M. Padwal Vidyalaya मधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवत तिला सातत्याने प्रोत्साहन दिले.
विशेष म्हणजे, डॉ. संदीप माने सर हे सायलीसाठी केवळ शिक्षक नसून ‘दत्तक बाप’ ठरले. त्यांनी तिला नोट्स, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले, वेळोवेळी घरी जाऊन मार्गदर्शन केले. स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी सायलीला वैयक्तिक मार्गदर्शन केले. एवढेच नव्हे तर तिच्या क्लासची फीही स्वतः भरत अनेक वर्षे तिच्या पाठीशी भक्कम आधार बनून उभे राहिले. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ते आजही निस्वार्थीपणे कार्य करत असल्याची भावना सायलीने व्यक्त केली.
“सातत्य, चिकाटी आणि संघर्षातून पुढे जाण्याची प्रेरणा मला माने सरांकडून मिळाली,” असे सायली अभिमानाने सांगते.
SSC परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवत सायलीने आई-वडील आणि शिक्षकांच्या कष्टाचे चीज केले आहे. भविष्यात फायनान्स क्षेत्रात करिअर करत CMA होण्याचे तिचे स्वप्न आहे. “लहानपणापासून पैशांची किंमत जवळून पाहिली आहे. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी फायनान्स क्षेत्रात काम करायचे आहे,” असे ती सांगते.
सायलीने आपल्या भावना व्यक्त करत डॉ. संदीप माने सरांसाठी ‘शेकडो पोरांचा बाप माणूस’ ही हृदयस्पर्शी कविता लिहिली आहे. गरीब विद्यार्थ्यांना मायबाप गुरूप्रमाणे साथ देणाऱ्या शिक्षकांमुळेच अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत असल्याची भावना तिने या कवितेतून व्यक्त केली आहे.


















