वरळीपर्यंत धावणार भूमिगत मेट्रो ३
मुख्यमंत्री फडणवीस दाखवणार हिरवा झेंडा
मुंबई,दि.८ ( मंगेश म्हात्रे )
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या शहरातील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेचा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) हा दुसरा टप्पा येत्या शनिवारपासून (ता. १० मे) प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या नव्या टप्प्याचा शुभारंभ शुक्रवारी (ता.९ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन गेल्या वर्षी करण्यात आले होते आणि तेव्हापासून तो टप्पा प्रवाशांसाठी खुला आहे. बीकेसी ते वरळी या २अ टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मागील काही आठवड्यांपासून सुरक्षा चाचण्या सुरु होत्या. सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता हा टप्पा देखील प्रवासासाठी तयार झाला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस (ता.९ मे) रोजी या मार्गाला हिरवा झेंडा दाखवून बीकेसी ते सिद्धिविनायक स्टेशनपर्यंत मेट्रो प्रवास करणार आहेत. मेट्रो ३ च्या कामाला आता अंतिम टप्पा गाठताना दिसत असून उर्वरित मार्ग लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना जलद व सुरक्षित प्रवास सुविधा मिळवून देण्यासाठी मेट्रो ३ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




















