मुंबई, दि.२ ( अजय मगरे )
मुंबई महानगर प्रदेशासाठी परिवर्तन घडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी उत्तन–विरार सागरी सेतू (यूव्हीएसएल) प्रकल्पाला आता अधिक गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या पुढाकाराने, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीत वेग आला आहे. दळणवळण सुधारणा, आर्थिक विकास आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा हे या प्रकल्पाचे मुख्य आधारस्तंभ ठरत आहेत.

१५९व्या प्राधिकरण बैठकीत यूव्हीएसएल टप्पा-१ च्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्यात आली. सुरुवातीला एमएसआरडीसी अंतर्गत वर्सोवा–विरार सागरी सेतू म्हणून या प्रकल्पाची आखणी झाली होती. मात्र, ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रकल्प एमएमआरडीएकडे हस्तांतरित झाला. टप्पा-१ मध्ये उत्तन ते विरार सागरी सेतू आणि त्यास जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे, तर टप्पा-२ (विरार–पालघर) सध्या अभ्यासाधीन आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि फायदे
यूव्हीएसएलद्वारे आठ मार्गिकांचा उच्चगती दुवा तयार होणार असून तो थेट दिल्ली–मुंबई द्रुतगती महामार्गाशी जोडला जाईल. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड यांसारख्या मार्गांवरील वाहतूक कमी होऊन प्रदूषणात घट होईल. औद्योगिक, व्यापारी आणि निवासी भागांना सुलभ प्रवेश उपलब्ध होऊन आर्थिक व्यवहार गतिमान होतील. गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, आपत्कालीन सेवा आणि पर्यटनया सर्व क्षेत्रांना चालना मिळेल. शिवाय पर्यावरणस्नेही रचना व वाहतुकीतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
तांत्रिक विशेषता आणि रचना सुधारणा
५५.१२ किमी लांबीचा हा टप्पा सागरी सेतू (२४.३५ किमी) आणि तीन प्रमुख जोडरस्त्यांचा समावेश करतो. यात इन-सिटू ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकसारखी प्रगत व टिकाऊ रचना, ३०–३५ मीटर खोल पाया, आणि सुधारित संरेखन रॅम्पसह रस्त्यांचे पुनर्रचना यांचा समावेश आहे. बोगदे, आयटीएस प्रणाली आणि सुरक्षितता उपायांचीही भर घालण्यात आली आहे.
या सेतूसाठी निधीपुरवठा आणि खर्च जायका (JICA) कडून ७२% निधी आणि महाराष्ट्र शासन व एमएमआरडीएकडून २८% निधी मिळून ₹८७,४२७.१७ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि राज्याच्या समन्वयाची साक्ष देणारी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा प्रकल्प महाराष्ट्राच्या भविष्याकडे नेणारा कनेक्टिव्हिटी आणि पर्यावरणपूरकतेचा आदर्श आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “‘वन एमएमआर, वन ग्रोथ स्टोरी’ या संकल्पनेच्या दिशेने यूव्हीएसएल महत्त्वाची झेप आहे.”
महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले की, “हा प्रकल्प केवळ अंतर कमी करणारा नसून, दैनंदिन आयुष्याला जोडणारा आणि सक्षम करणारा आहे.”




















