कोपरगाव तालुक्यातील भारनियमन तातडीने बंद करा; शेतकरी नेते रघुनाथ गुरसळ पाटील यांची मागणी
कोपरगाव : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण भारनियमनामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामीण भागातील भारनियमन तातडीने बंद करून पूर्ण दाबाने आणि अखंडित वीजपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी सामाजिक शेतकरी नेते रघुनाथ गुरसळ पाटील यांनी केली आहे.
वीज वितरण कंपनी आणि विद्युत नियामक आयोगाने ग्रामीण भागाला नियमानुसार अकरा तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याचे निर्देश दिलेले असतानाही प्रत्यक्षात मात्र वारंवार वीज खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन कोलमडत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांचे दैनंदिन व्यवहारही विस्कळीत झाले आहेत.
विशेषतः रात्रीच्या वेळी वीज नसल्याने ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर, रस्त्यांवरील अंधार, दळणवळणातील अडचणी, पिठाच्या गिरण्या बंद राहणे तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. या गंभीर समस्यांचा विचार करून महावितरणने तातडीने भारनियमन बंद करून सुरळीत व पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरू करावा, अशी एकमुखी मागणी कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.




















