परीक्षेला पोहोचताना वाहतूक कोंडी, वाहन बिघाड झाल्यास तातडीची मदत; हेल्पलाईन क्रमांक जारी
ठाणे, दि.६.( अजय मगरे )
दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिस विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे अडचणीत सापडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ठाणे वाहतूक पोलिस सज्ज झाले असून, शहरातील प्रमुख मार्गांवर ५४ वाहतूक ‘रायडर्स’ तैनात करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक (१० वी) आणि उच्च माध्यमिक (१२ वी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अनुक्रमे १० फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. या परीक्षांसाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या १ ते ५ परिमंडळांत इयत्ता १२ वीची एकूण १२६ परीक्षा केंद्रे, तर इयत्ता १० वीची २२३ परीक्षा केंद्रे आहेत.
परीक्षा केंद्राकडे जाताना विद्यार्थ्यांना रस्त्यांवर कोणत्याही कारणामुळे अडचण निर्माण झाल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी वाहतूक विभागाकडून ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईन क्रमांक 8286300300 व 8286400400, तसेच व्हॉटसॲप क्रमांक 7039003866 सुरू करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील १८ वाहतूक युनिट्समध्येही स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षात अतिरिक्त तीन वाहने देखील तैनात असणार आहेत.
रस्त्यांवरील अडचणींबाबत माहिती मिळताच वाहतूक पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतुकीतील अडथळे दूर करतील आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मदत करतील.
ही सुविधा केवळ परीक्षा कालावधीसाठी उपलब्ध असून, परीक्षा काळात पालकांनी तसेच नागरिकांनीही या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.


















