बनावट नियुक्तीपत्रे, शासकीय लेटरहेड व शिक्क्यांचा वापर; गुन्हे शाखा, भिवंडीची मोठी कारवाई
भिवंडी : प्रतिनिधी
महसूल व वन विभागात शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघा आरोपींना ठाणे गुन्हे शाखा, घटक-२ (भिवंडी) यांनी अटक केली आहे. आरोपींकडून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट शासकीय लेटरहेड, शिक्के व बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली असून या प्रकरणात आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.
तक्रारदार दर्शन संतोष पाटील (वय २८, रा. काल्हेर, भिवंडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुख्य आरोपी शाम विठोबा खतकर याने महसूल व वन विभागात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत विश्वास संपादन केला. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सही व राजमुद्रा असलेली बनावट पत्रे दाखवून त्यांच्याकडून ऑनलाईन, बँकेमार्फत आणि रोख स्वरूपात ७० लाख रुपये उकळले. त्यानंतर बनावट नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन नोकरी न देता फसवणूक केली.
या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८१४/२०२६ दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शाम विठोबा खतकर (५५), जुगल कुमार लोडाया उर्फ लोधिया (३९) आणि रविंद्र दयानिधी शंखुआ (५२) या तिघांना अटक केली.
तपासादरम्यान आरोपींकडून मंत्रालयातील विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट शासकीय लेटरहेड, शिक्के आणि अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या टोळीने यापूर्वीही अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा संशय असून त्याचा तपास सुरू आहे. तसेच बनावट कागदपत्रे आणि शिक्के कुठून तयार करण्यात आले, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांच्या तपासात अटक आरोपींविरुद्ध यापूर्वीही मुंबई, ठाणे, हिंगोलीसह विविध पोलीस ठाण्यांत फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
दरम्यान, शासकीय नोकरी लावून देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच अशा प्रकारच्या फसवणुकीची माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.




















