मुंबई, दि. ३० : अजय मगरे
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाकडे भाजपने वारंवार दुर्लक्ष केल्याने रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. बांद्रा येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जागावाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळाला नसून, ही भूमिका निषेधार्ह असल्याची तीव्र नाराजी आठवले यांनी व्यक्त केली. अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपने आपल्या कोट्यातील किमान १० ते १२ जागांवर माघार घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. अन्यथा मुंबईत ३८ जागांवर महायुतीशी मैत्रीपूर्ण लढत देण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
रिपब्लिकन पक्षाने यापूर्वी भाजपकडे मागितलेल्या जागांची यादी दिली होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आश्वासने देऊनही प्रत्यक्षात एकही जागा देण्यात आली नाही, असा आरोप आठवले यांनी केला. महायुतीचा प्रमुख घटक असूनही रिपब्लिकन पक्षावर अन्याय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये भाजपकडून रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.


















