कोपरगाव दि.१८ ( दिलीप गायकवाड
कोपरगाव तहसील कार्यालयासमोरील मैदानात एकलव्य संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाचे बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. संघटनेचे कोपरगाव कार्याध्यक्ष निलेश ठाकरे आणि तालुका अध्यक्ष उत्तम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आदिवासी कुटुंबे, महिला आणि लहान मुले रखरखत्या उन्हात बसून आंदोलन करत आहेत. तहसील कार्यालयासमोर चूल मांडून स्वयंपाक करत आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रवंदे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाज अनेक वर्षांपासून राहत आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत नोटीसा पाठवून घरे हटवण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही येथे अनेक वर्षे वास्तव्यास आहोत, त्यामुळे आम्हाला पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या मागणीसाठी रवंदे गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि कोपरगाव गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. जोपर्यंत पर्यायी जागा देऊन पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा निलेश ठाकरे आणि उत्तम पवार यांनी दिला आहे.
यासंदर्भात कोपरगाव तहसील अधिकारी जिल्हा कार्यालयात गेल्याचे नायब तहसीलदार सातपुते यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, सदर प्रकरण बीडीओ कार्यालयाशी संबंधित असून, लवकरच बैठक घेऊन तहसील अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल. मात्र, तातडीने पुनर्वसन करणे शक्य नसल्याने सध्या आंदोलनकर्त्यांच्या मागणीवर त्वरित निर्णय होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





















