मुंबई, दि. १८ मार्च २०२५ :- नागरिकांच्या तक्रारींचे तत्पर आणि न्याय्य निवारण करण्याच्या उद्देशाने म्हाडाच्या मुख्यालयात लोकशाही दिन राबविण्यात येतो. त्याच धर्तीवर म्हाडा नाशिक मंडळानेही पहिल्या जनता दरबार दिनाचे आयोजन केले.
नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पहिल्या जनता दरबारात ६ अर्जदारांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश दिले. यापुढे, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार दिन आयोजित करण्यात येणार आहे. जर पहिला सोमवार सार्वजनिक सुट्टीचा असेल, तर त्यानंतरच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी जनता दरबार होईल, अशी माहिती आवळकंठे यांनी दिली.
१०० दिवसांचा कृती आराखडा – जनतेसाठी प्रभावी उपक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी म्हाडा उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सर्व विभागीय मंडळांना “नागरिकांच्या तक्रारींचे निवारण” हा महत्त्वपूर्ण घटक प्राधान्याने राबवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, नाशिक मंडळाने जनता दरबार सुरू केला आहे.




















