शाळांचा सर्व व्यवहार मराठीत करण्याची काँग्रेसची मागणी
ठाणे, दि. ४ : अजय मगरे
ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने शाळांना मराठी नामफलक लावणे सक्तीचे केले असतानाच आता यावरून नवे राजकीय समीकरण तापू लागले आहे. “नामफलकापुरतेच मर्यादित नका राहू; शाळांचा सर्व व्यवहार मराठीतच व्हावा,” अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.
शासनाच्या २०१४ च्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून मनपाने आठ दिवसांच्या आत मराठी नामफलक लावण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. मात्र, काँग्रेसने हा निर्णय अपुरा असल्याचे सांगत शाळांतील पत्रव्यवहार, रोजनिशी, अर्ज, हजेरी, हिशेब, निकालपत्रे यासह सर्व कागदपत्रे मराठीतच असावीत, असा ठाम आग्रह धरला आहे.
मराठी ही राज्यभाषा असून ती केवळ फलकांपुरती मर्यादित ठेवणे हा मराठीचा अपमान आहे. मुलं मराठीत शिकतात, पण शाळेच्या ऑफिसातील व्यवहार इंग्रजी किंवा हिंदीत होतात. खरा सन्मान तेव्हाच होईल, जेव्हा सर्व कागदपत्रे मराठीत मिळतील,” असे विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिक्षण विभागासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. भाजप-शिवसेना केवळ नामफलकांवर भर देत असताना, काँग्रेसने दैनंदिन व्यवहाराचा मुद्दा पुढे आणल्याने राजकीय तापमान वाढले आहे.
दरम्यान, मराठीवादी संघटनांनीही या मागणीचे स्वागत केले आहे. “फलकापुरते आदेश मर्यादित ठेवले, तर मराठीची उपेक्षा थांबणार नाही. शाळांचे सर्व व्यवहार मराठीत झाल्यासच मुलांना खरी मातृभाषेची ताकद मिळेल,” असे स्थानिक संघटनांचे म्हणणे आहे.
ठाण्यातील अनेक पालकांनीही यास पाठिंबा दर्शवला आहे. आता ठाणे मनपा शिक्षण विभाग पुढील निर्णयात फक्त नामफलकांपुरते थांबते की सर्व व्यवहार मराठीत करण्यास सुरुवात करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.




















