मुंबई, दि. ६ ऑगस्ट : मंगेश म्हात्रे
म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत डिसेंबर २०१६ मध्ये कोन (पनवेल) येथे गिरणी कामगारांसाठी २४१७ घरांची सोडत काढण्यात आली होती. मात्र, तब्बल १३०९ यशस्वी लाभार्थ्यांनी आजतागायत सदनिकांचा ताबा घेतलेला नाही.
या पार्श्वभूमीवर म्हाडाने यशस्वी लाभार्थ्यांना अखेरची संधी देताना, ७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ताबा घेण्याचे आवाहन केले आहे. या ३० दिवसांच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांनी विहित कागदपत्रांसह उपमुख्य अधिकारी (गिरणी), मुंबई मंडळ, कक्ष क्र. २०४, पहिला मजला येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.
प्रत्यक्ष येणे शक्य नसलेल्या लाभार्थ्यांसाठी ई-मेल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, panvelkondoc.mhada@gmail.com या पत्त्यावर आवश्यक माहिती आणि कागदपत्रे पाठवता येतील. ही सुविधा केवळ कोन पनवेल सोडतीतील यशस्वी लाभार्थ्यांसाठीच आहे.
तब्बल आठ वर्षांनंतरही सदनिकांचा ताबा न घेतलेल्या लाभार्थ्यांना म्हाडाने स्पष्ट इशारा दिला आहे की, या मुदतीत ताबा न घेतल्यास प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना संधी दिली जाईल. भविष्यात कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका म्हाडाने घेतली आहे.
ताबा न घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mhada.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे. गिरणी कामगार संघटनांनी आणि संबंधित नातेवाइकांनी हे आवाहन लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावे, असे आवाहनही म्हाडाने केले आहे.




















