पैठण, दि.७. ( अभिजीत सोनवणे )
जि. छत्रपती संभाजीनगर – पैठण तालुक्यातील क्रमांक दोन असलेल्या वीरभद्र नदीचे खोलीकरण काही दिवसांपूर्वी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झाले होते. काल या भागात झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात नदीचे पात्र तुडुंब भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

या कामामुळे निश्चितच परिसरातील भूजल पातळी वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतीचे संपूर्ण अर्थकारण पाण्यावर अवलंबून असल्याने, रब्बी हंगामातही पिके घेता येतील आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळण्यास मदत होईल. तसेच, काही भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या उपक्रमामागे श्री. किशोर तांगडे पाटील या भागातील तरुण कार्यकर्त्याचा मोलाचा वाटा आहे. शेतकरी कुटुंबातून येणारे व या भागाच्या गरजा समजून घेणारे किशोर तांगडे यांनी नाम फाउंडेशनसोबत सातत्याने संपर्क ठेवत, शासनाच्या संबंधित विभागाशी पाठपुरावा करून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यामुळे हे खोलीकरणाचे काम मंजूर होऊन प्रत्यक्षात अंमलात आणले गेले.
काम सुरू झाल्यानंतर देखील त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन ते वेळेत पूर्णत्वास नेले. स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीयांनीही या उपक्रमात सहकार्य केले. सुरुवातीला काही शेतकऱ्यांच्या मनात कामाबाबत शंका होत्या, परंतु किशोर तांगडे यांनी सर्वसमावेशक भूमिका घेत त्या दूर करून लोकांचा विश्वास संपादन केला.
नाम फाउंडेशनचे समन्वयक म्हणून त्यांच्या कामाची प्रशंसा होत असून, परिसरातील नागरिकांनी याच धर्तीवर इतर गावांमध्येही अशी कामे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
—
प्रतिक्रिया – किशोर तांगडे पाटील (समन्वयक, नाम फाउंडेशन)
“नाम फाउंडेशनच्या समन्वयक या नात्याने मला जी जबाबदारी दिली होती, ती मी माझ्या सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मित्रपरिवाराच्या सहकार्याने पूर्ण केली. पुढील काळात इतर भागांमध्येही अशा स्वरूपाची कामे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”




















