कोपरगाव, दि.२८ : दिलीप गायकवाड
कोपरगाव शहरातील ज्येष्ठ शिक्षक नेते व समाजकारणात आपली छाप उमटवणारे स्व. माधवराव गोपाळा पा. मते (मते गुरुजी) यांचे ( दि.२०) वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षकवर्गासह संपूर्ण कोपरगावात शोककळा पसरली आहे.
“मते गुरुजी” या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांचा अध्यापन प्रवास शिर्डी, वेलापूर, पाथरे, कोपरगाव नगरपालिका शाळा (कालेमळा व सराफ बाजार) येथे झाला. असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे हे कठोर परिश्रमी शिक्षक कोपरगाव बेट येथून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले.त्यांचा स्वभाव शांत, संयमी असला तरी शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठाम आणि कणखर भूमिका घेतली. प्राथमिक शिक्षक संघाचे तब्बल १५ वर्षे ते शहराध्यक्ष राहिले.
१९७७ मधील संपूर्ण महाराष्ट्र शिक्षण आंदोलनात त्यांनी ५४ दिवस नेतृत्व करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला. शिक्षकांची पगारवाढ व मुख्याध्यापक पदांची भरती यासाठी त्यांनी कायदेशीर व संघटनात्मक लढा दिला. त्यामुळे त्यांना “शिक्षक हक्कांसाठी लढणारे योद्धा” म्हणून संपूर्ण राज्यात ओळख मिळाली.
उत्तम शिक्षक, प्रगतिशील शेतकरी व कायद्याचे जाणकार अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची पत्नी स्व. प्रयागाबाई या देखील आदर्श शिक्षिका होत्या. मुलं प्रमोद व महेश मते हे वडिलांच्या प्रेरणेने समाजकार्यात सक्रिय आहेत.
त्यांच्या निधनामुळे शिक्षकवर्ग, व्यापारी वर्ग व नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.
“मोडेल पण वाकणार नाही” या वृत्तीने आयुष्य जगणाऱ्या स्व. मते गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली – नारायण शेठ अग्रवाल, मो. ९८२२६३०३३०




















