म्हाडाच्या तीन महत्त्वाकांक्षी समूह पुनर्विकास प्रकल्पांच्या वित्तीय निविदा खुल्या; अंधेरीच्या एसव्हीपी नगरसाठी जेएसडब्ल्यू-संबंधित समूह आघाडीवर
मुंबई, २ जून :मंगेश म्हात्रे
मुंबईतील हजारो रहिवाशांचे लक्ष लागलेल्या म्हाडाच्या तीन मोठ्या समूह पुनर्विकास प्रकल्पांबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. वरळीतील आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लेमेशन या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मे. अदानी प्रॉपर्टीज प्रा. लि. सर्वाधिक बोलीदार ठरली आहे. त्यामुळे मुंबईतील या मोक्याच्या भागांतील पुनर्विकासाची सूत्रे अदानी समूहाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
म्हाडाकडून उघडण्यात आलेल्या वित्तीय निविदांमध्ये वरळी आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लेमेशनसाठी अदानी प्रॉपर्टीजने आघाडी घेतली आहे. तर अंधेरी पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल (एसव्हीपी) नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी हनुरा रियलटी, चांडक रियलटर्स, प्रेमसागर इन्फ्रा रियलटी आणि वॅनटियर रियलटी यांच्या समूहाने सर्वाधिक बोली नोंदवली आहे.
या तिन्ही प्रकल्पांमध्ये अंधेरी पश्चिम येथील एसव्हीपी नगरचा ७३.८९ एकर , वांद्रे रेक्लेमेशनचा ९८.२७ एकर आणि वरळी आदर्श नगरचा ३४.३३ एकर क्षेत्रफळाचा समावेश आहे. मुंबईच्या पुनर्विकासाच्या दृष्टीने हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
म्हाडाच्या माहितीनुसार, सर्वाधिक बोलीदारांच्या निविदा स्वीकृतीचा प्रस्ताव आता उच्चाधिकार समितीकडे पाठविण्यात येणार असून समितीच्या मंजुरीनंतर अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
पुनर्विकास काळात पात्र रहिवाशांना भाडे तसेच देखभालीसाठी कॉर्पस निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आधुनिक सुविधा, सक्षम पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याचा उद्देश असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.
मुंबईतील या तीन मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांकडे आता बांधकाम क्षेत्रासह हजारो रहिवाशांचे लक्ष लागले आहे.




















