आयात उमेदवारांच्या चर्चांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांत नाराजी
मुंबई, दि. २ : मंगेश म्हात्रे
मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच धारावी भाजपच्या उमेदवारांच्या चर्चांसाठी हॉटस्पॉट बनला आहे. विशेषतः ‘आयात उमेदवार’ आणण्याच्या शक्यतेमुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी उसळली असून, धारावीच्या राजकारण ढवळून निघालं आहे. याचे पडसाद सोशल मीडियावर दिसत आहेत. “स्थानिक नेतृत्व असताना बाहेरचे उमेदवार का लादले जात आहेत ?” अशी खंत स्थानिक भाजप कार्यकर्ते सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
भाजपच्या आयात उमेदवाराच्या चर्चेत वर्सोव्यातील महिला पदाधिकारी आणि सायन कोळीवाडयामधील माजी नगरसेवकांच्या नावांची चर्चा गती घेताच, स्थानिक कार्यकर्त्यांच्या नाराजीला आणखी उधाण आले. नगरसेवक पद ही तळागाळातील कार्यकर्त्यांची निवडणूक समजली जाते. त्यामुळे “स्थानिक चेहऱ्यावर मतं मिळतात, तर आयात उमेदवाराचा आग्रह कशासाठी?” असे सवाल कार्यकर्त्यांकडून विचारले जात आहेत.
भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य उदय नांदे यांनी बहुजन शक्ती न्यूजशी बोलताना स्पष्ट मत मांडले : “मी बाहेरून येणाऱ्यांच्या विरोधात नाही, पण स्थानिक कार्यकर्त्यांचा हक्क हिरावला जाऊ नये. उमेदवार स्थानिक असावा. “हारला तर स्थानिक कार्यकर्ता हारेल, जिंकला तर स्थानिक कार्यकर्ता जिंकेल. पण आयात उमेदवार दिला विरोधकांना अपप्रचार करण्याची आयती संधी मिळते. तर दोन्हीकडून स्थानिक कार्यकर्त्यांला रोषाला सामोरे जावे लागते. स्थानिक चेहऱ्यासाठी प्रत्येक वॉर्डातील इच्छुकांनी आवाज उठवला पाहिजे. यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे .” नांदे यांनी सांगितल.
बाहेरील उमेदवारामुळे स्थानिक नागरिकांमध्येही अस्वस्थता वाढताना दिसते. त्यांच्यातील चर्चेत नेहमी ऐकू येणारा मुद्दा एकच—“आमच्याकडे पुरेसे नेतृत्व असताना बाहेरचा उमेदवार का? तो आमचं प्रतिनिधित्व करणार तरी कसं?” काही मतदारांनी तर स्पष्ट इशारा दिला आहे की, आयात उमेदवार दिल्यास मतदानात नाराजी दिसून येऊ शकते.
धारावीत भाजपची राजकीय समीकरणे आधीच कमजोर मानली जातात—ना नगरसेवक, ना आमदार. अशा परिस्थितीत बाहेरील उमेदवारांचा आग्रह का केला जातो? असा सरळ सवाल पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.




















