माता रमाबाई आंबेडकर नगर,झोपडपट्टी पुनर्वसनात एमएमआरडीए ‘विकासक’
मुंबई,दि.२१ ( प्रतिनिधी )
मुंबईच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) प्रथमच ‘विकासक’ या भूमिकेत घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविणार आहे.
हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे.
एकूण ३१.८३ हेक्टर क्षेत्रावर वसलेल्या या भव्य प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ६.९५ हेक्टर शासकीय मालकीच्या भूखंडाचा समावेश आहे. लवकरच हा भूखंड एमएमआरडीएकडे हस्तांतरित केला जाणार असून, त्याचा उपयोग झोपडपट्टीवासीयांसाठी कायमस्वरूपी घरे उभारण्यासाठी केला जाणार आहे.
झोपडपट्टीवासीयांच्या सन्मानजनक पुनर्वसनासाठी, अद्याप पुनर्वसन न मिळालेल्या १,६९४ कुटुंबांना दोन वर्षांचे भाडे अनुदान दिले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ३,६३१ धनादेश वाटप पूर्ण झाले आहेत. हे वितरण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) मार्फत सुरु असून, मान्यवरांच्या उपस्थितीत हे काम वेगाने पार पडत आहे.
माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील एकूण १६,६७५ झोपडपट्टीवासीयांना पात्र लाभार्थी म्हणून निश्चित करण्यात आले आहे. भू-सर्वेक्षण, पात्रतेचे निर्धारण, भूखंड रिकामे करून ते एमएमआरडीएकडे हस्तांतरित करणे ही जबाबदारी एसआरए पार पाडते. त्यानंतर एमएमआरडीए पुनर्वसन इमारतींच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती करणार आहे.
हा प्रकल्प केवळ पुनर्वसन नव्हे, तर शाश्वत व न्याय्य शहर विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.




















