मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शासकीय यंत्रणांमधील डिजिटल कार्यक्षमता तपासणाऱ्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)ने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. झो.पु.प्रा. बृहन्मुंबईने २०० पैकी १९६ गुण मिळवत राज्यातील ९७ शासकीय संस्था, मंडळे व महामंडळांमध्ये दुसरे स्थान मिळवले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्र सागरी मंडळ या महामंडळाने मिळवला असून, त्यांना २०० पैकी १९८ गुण प्राप्त झाले आहेत. याआधी झालेल्या १०० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स स्पर्धेत मात्र एसआरए प्राधिकरणाने प्रथम क्रमांक पटकावला होता.
१५० दिवसांच्या स्पर्धेत एसआरएला १९६, एमएमआरडीएला १८१ तर म्हाडाला १६७ गुण मिळाले असून, एमएमआरडीए चौथ्या तर म्हाडा सहाव्या क्रमांकावर आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने या स्पर्धेचे महत्त्व असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
डिजिटल सुधारणा, ऑनलाइन सेवा, तक्रार निवारण आणि कार्यक्षमता या निकषांवर ही स्पर्धा घेण्यात आली होती. या निकालामुळे संबंधित संस्थांच्या कामगिरीवर प्रकाश पडला असून, पुढील काळात ई-गव्हर्नन्स अधिक प्रभावी करण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.


















