२५ वर्षांपासून रखडलेली ‘ इंदिरा ‘ योजना तातडीने सुरू करण्याची मागणी…
मुंबई, दि. २३ : मंगेश म्हात्रे
बहुजन शक्ती टॅक्सी चालक मालक सहकारी संघटनेच्या वतीने वरळीतील टॅक्सी चालक व रहिवाशांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या २५ वर्षांपासून बंद असलेली एसआरए योजना तातडीने सुरू करून रहिवाशांना हक्काची घरे द्यावीत, या मागणीसाठी संघटनेने एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांना निवेदन दिले आहे.
वरळी नाका परिसरातील प्रेमनगर व सिद्धार्थनगर येथे असलेली इंदिरा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था सन २००२-०३ मध्ये स्थापन झाली होती. या योजनेअंतर्गत त्या काळात झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर तब्बल २५ वर्षे उलटूनही प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही.परिणामी येथील अनेक टॅक्सी चालक व रहिवाशी आजही भाड्याच्या घरात राहत आहेत. विशेष म्हणजे संबंधित विकासकाने या संपूर्ण कालावधीत कोणतेही मासिक भाडे दिले नसल्याचा आरोप रहिवाशांनी निवेदनात केला आहे.
एकीकडे भाड्याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना, दुसरीकडे संस्थेची एक अर्धवट अवस्थेतील इमारत उभी असून मूळ इमारतीचे काम कधी पूर्ण होणार, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने रहिवाशी हवालदिल झाले आहेत. आमच्या मालकीचे घर कधी मिळणार, या प्रश्नाचे उत्तर देण्यास एसआरए आणि विकासक दोघेही अपयशी ठरत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर एसआरएने वैयक्तीक लक्ष घालून योजना रखडविणाऱ्या संबंधितावर कठोर कारवाई करावी, रखडलेली योजना तातडीने सुरू करावी आणि रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी बहुजन शक्ती टॅक्सी चालक मालक सहकारी संघटनेने केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.



















