कोपरगाव,दि.६. ( दिलीप गायकवाड )
कोपरगाव नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरी पायाभूत सुविधा कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार योजना प्रकल्पातील कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुमारे २२७ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मे. मंगळिया ब्रदर्स प्रोजेक्ट अँड जयंती सुपर (जेनी), गुजरात या कंपनीकडून राबविला जात आहे.
या प्रकल्पातील कामात मोठ्या प्रमाणात त्रुटी, तांत्रिक दोष व निष्काळजीपणा असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. याबाबत यापूर्वीही नगर परिषद प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, दि. २० जानेवारी २०२६ रोजी पुकारलेल्या आमरण उपोषणावेळी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, प्रकल्प सल्लागार व ठेकेदार यांनी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण करण्यात आलेली नसल्याचा आरोप विनय भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
आमरण उपोषण मागे घेण्यासाठी देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भगत यांनी निवेदनाद्वारे दिला असून, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, कोपरगाव नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार योजना प्रकल्पातील कथित निकृष्ट कामाच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली.
या बैठकीत प्रकल्पाच्या कामाचा दर्जा, नागरिकांकडून प्राप्त तक्रारी तसेच पुढील कार्यवाही याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी कामातील त्रुटी, गैरप्रकार, तसेच प्रशासन व ठेकेदारांकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याबाबत आपल्या भावना स्पष्टपणे मांडल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यात येईल आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. प्रशासन नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहत असून, नागरिकांना योग्य न्याय दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


















