७५ हजारांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा वाढली; अनामत रक्कम महिनोनमहिने अडकली
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या बहुचर्चित म्हाडा सोडतीची प्रतीक्षा आता आणखी लांबली आहे. तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही लॉटरीची तारीख निश्चित न झाल्याने ७५ हजारांहून अधिक अर्जदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यावेळी सोडत लांबण्यामागचे कारण म्हणजे प्रमुख पाहुण्यांची वेळ उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.
३० मार्च रोजी जाहीर झालेल्या या सोडतीसाठी सुरुवातीला १५ मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र कमी प्रतिसादामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आणि सोडत ५ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आचारसंहिता, मुदतवाढ आणि आता प्रमुख पाहुण्यांच्या उपलब्धतेमुळे कार्यक्रम पुन्हा लांबला आहे.
दरम्यान, अर्जदारांनी भरलेली लाखो रुपयांची अनामत रक्कम अनेक महिन्यांपासून म्हाडाकडे अडकून आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, “घराचे स्वप्न अखेर कधी पूर्ण होणार?” असा संतप्त सवाल अर्जदारांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी पुढील आठवड्यात सोडतीच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली जाईल, असे सांगितले आहे. मात्र प्रत्यक्ष लॉटरीची तारीख अद्याप निश्चित नसल्याने अर्जदारांमध्ये संभ्रम कायम आहे. वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या प्रक्रियेमुळे म्हाडाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अर्जदारांचा विश्वासही डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.




















