“पात्रतेनुसार स्थलांतर” अटीवर रहिवाशांमध्ये संभ्रम
मुंबई: मंगेश म्हात्रे
सायन प्रतिक्षानगर येथील धोकादायक ठरलेल्या चार संक्रमण इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असला, तरी “पात्रतेच्या धोरणानुसार स्थलांतर” या अटीमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार रहिवाशांना त्याच अभिन्यासात- सायन प्रतिक्षा नगरात स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, पात्रता निकष नेमके काय असतील? कोणाला नवीन संक्रमण सदनिका मिळणार आणि कोण वंचित राहणार? याबाबत रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही रहिवाशांनी स्पष्ट निकष जाहीर करण्याची मागणी केली असून, पारदर्शक प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या निर्णयानुसार, ४ संक्रमण इमारतींतील २६१ भाडेकरू/रहिवासी आणि ४ दुकानदारांसाठी तळ + २२ मजली अशा २ इमारतींमध्ये एकूण ३२२ संक्रमण सदनिका उभारण्यात येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असला, तरी पात्रतेच्या अटीवरून पुढे वाद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, इमारत क्रमांक ३६, ३७, ५३ आणि ५४ यांच्या खाली भूमिगत जलवाहिनी गेल्याने तडे गेल्याच्या तक्रारीनंतर आयआयटी मुंबईकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुनर्विकासाची स्पष्ट शिफारस करण्यात आली होती. पुनर्विकास पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना म्हाडाच्या धोरणानुसार भाडे देऊन तात्पुरते स्थलांतर करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
सुरक्षिततेचा निर्णय की पात्रतेवरून निर्माण होणारा वाद? प्रतिक्षानगर पुनर्विकासाचा हा मुद्दा आता अधिक चर्चेत येण्याची शक्यता आहे.


















