ठाणे, दि. ३० : अजय मगरे
“विरारमधील दुर्घटनेत निरपराधांचे जीव गेले, ठाण्यात तशी पुनरावृत्ती होऊ नये. अतिधोकादायक इमारतीत राहणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण आहे. तातडीने घर रिक्त करा, सुरक्षिततेला प्राधान्य द्या!” असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील ९३ अतिधोकादायक इमारतींपैकी ५६ आधीच रिक्त झाल्या असल्या तरी, अजूनही ३७ इमारतींमध्ये तब्बल १९१ कुटुंबे मृत्यूच्या छायेत वास्तव्य करत आहेत. या धाडसी पण धोकादायक हट्टामुळे कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने आता अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आपल्या घराचा ताबा कोणी घेणार नाही, तो तुमचाच राहील. पण सध्या जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. प्रशासन तुम्हाला फसवणार नाही, पण जर हललात नाही तर तुमचेच कुटुंब संकटात सापडेल,” असे आयुक्त राव यांनी रहिवाशांना समजावले.
आयुक्तांचे महत्त्वाचे निर्देश :
प्रत्येक अतिधोकादायक इमारतीवर लाल अक्षरात ‘धोकादायक – ही इमारत रिक्त करा’ असे फलक लावले जातील.
नागरिकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सतत सूचना पाठवल्या जातील.
घराघरात पत्रके वाटून इमारतीत राहण्याचे गंभीर परिणाम सांगितले जातील.
दुरुस्तीशिवाय या इमारतीत एक दिवसही राहणे जीवावर बेतू शकते.
ठाण्यातील धोकादायक इमारती
नौपाडा-कोपरी : २७,उथळसर : ७,दिवा : २,मुंब्रा : १
आपत्ती व्यवस्थापन कक्ष : 1800-222-108 / 8657887101




















